Monday, December 2, 2019





मराठी चित्रपट सृष्टीत विस्मरणात गेलेले नाव दत्ता धर्माधिकारी

दत्ता धर्माधिकारी हे खरेतर एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल नांव. परंतु अलीकडच्या काळात या नावाची फारशी  दखल कोणी घेत नाही. २०१२ साली त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. परंतु मराठी चित्रपट सृष्टी आणि माध्यमांनी याची फारशी दखल घेतली नाही. हे सगळे लिहायचे कारण आज दोन डिसेंबर त्यांचा जन्मदिवस. आज सकाळी मुंबई आकाशवाणीने त्यांच्याबद्दल थोडी माहिती देऊन त्यांच्या चित्रपटातील काही गाणी लावली. ते ऐकल्यावर असे वाटले अरे खरे तर एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल फारच कमी माहिती आहे आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच. 
दत्ता धर्माधिकारी यांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात  प्रभात स्टुडिओमध्ये टाईम कीपर म्हणून केली. त्यानंतर व्ही शांताराम, फत्तेलाल, दामले यांचे सहाय्यक दिग्दर्शक आणि नंतर स्वतंत्र निर्माता आणि दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास. त्यांनी स्वतःची आल्हाद चित्र ही संस्था स्थापन केली होती. 
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत  बाळा जो जो रे (मातृप्रेम ), स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (बलात्कारित कुमारी मातेचा प्रश्न), भाग्यवान (अंधश्रद्धा निर्मूलन), एक धागा सुखाचा (अपंग मुलांचे दुःख), अबोली (मुक्या बहिऱ्या मुलीची व्यथा),  सावधान (दारू चे प्रश्न), सुहागन (स्त्रियांनी पैशाच्या मायावी दुनियेत फसू नये), सबसे बडा (रुपय्या पैशाने सर्व काही मिळत नाही), चिमणी पाखरं हे व असे अनेकविध विषय  त्यांच्या  हिंदी आणि मराठी चित्रपटात  हाताळले.  यातील बरेच चित्रपट सत्य घटनांवर आधारित होते हेही त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य.  यासारख्या सामाजिक चित्रपटांबरोबरच अखेर जमलं, आलिया भोगासी,  लग्नाला जातो मी यासारख्या विनोदी चित्रपटांची निर्मिती केली.  थांब लक्ष्मी कुंकू लावते, सतीच वाण, सतीची पुण्याई यासारखे धार्मिक आणि पौराणिक चित्रपटही केले. चित्रपट दिग्दर्शनाबरोबरच दैवे लाभला चिंतामणी, कुंकू जपून ठेव या नाटकांचे दिग्दर्शन करून तिथेही आपला ठसा उमटवला.  एकच चित्रपट एकाच वेळी  तीन भाषांमध्ये निर्माण करणारा हा  भारतातील पहिला निर्माता आणि दिग्दर्शक.
 या मायावी सृष्टीत राहूनही साधेपणा आणि शांतपणा  हे त्यांचे गुण होते.  मधुसूदन कालेलकर यांनी त्यांच्या ‘मधुघट’ या व्यक्तिचित्र संग्रहात त्यांच्यावरील लेखाला शीर्षकच मुळी ‘खरा ब्राह्मण’  असे दिले. ते लिहितात “धर्माधिकारी हे नावच चित्रपट धंद्यात कसेसेच वाटते. एखादी गाडी सांधे बदलण्यात चूक झाल्यामुळे जशी भलत्याच लाईन वरून जाते तसेच हे झाले असावे. नाहीतर इतका सज्जन, साधा, निर्व्यसनी माणूस या धंद्यात आला नसता.  धर्मराजानंतर अजातशत्रू म्हणून दत्तोबा यांचं नाव घ्यायला हरकत नाही . अत्युच्चपदी थोरही बिघडतो ही उक्ती धर्माधिकार्यांना कधीच लागू पडली नाही. वैभवाच्या शिखरावर (४ते५ परदेशी गाड्या) ते धवलगिरी सारखे भासतात.” तर इसाक मुजावर त्यांच्या ‘शेवटची भेट’ या पुस्तकात लिहितात “या चित्रपट सृष्टीत अनेक वर्षे असूनही ते सर्वोदय वादी राहिले होते. चित्रपटांच्या मोहमयी दुनियेत वावरूनहि ते बाई आणि बाटली पासून सदैव दूर राहिले. यामुळे त्यांचा उल्लेख चित्रपट व्यवसायातील चित्रपट व्यवसायातील धुतल्या तांदळासारखा स्वच्छ माणूस असा केला जायचा.” म्हणूनच त्यांच्या निधनानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण म्हणाल्या होत्या “त्यांचा पाठीवरून फिरलेला हात नेहमीच आश्वस्त पित्याचा वाटायचा.”  
त्याकाळात  आल्हाद चित्र कंपनीचे  मोठे कार्यालय  डेक्कन स्टुडिओत होते.  त्यांची क्रिकेट टीमही होती.  आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची काळजीही ते खूप घेत. त्यांनी कंपनीतील प्रत्येकाचे  बँकेत खाते उघडले होते.  पगारातील ठराविक रक्कम त्यात टाकली जायची व तेवढीच रक्कम अल्हाद चित्र तर्फे त्या त्या खात्यात जमा व्हायची.( थोडक्यात पीएफ) त्याकाळात त्यांनी पडद्यामागील कर्मचाऱ्यांचा भविष्याचा विचार केला होता हे किती जणांना माहित आहे. केलेल्या उत्तम कामाची प्रसिद्धी मिळवायची असा त्यांचा स्वभावच नव्हता. ज्या सहकाऱ्यांवर त्यांनी मुलांप्रमाणे प्रेम केले त्याच सहकाऱ्यांनी त्यांच्या साधेपणाचा आणि अव्यवहारी पणाचा गैरफायदा घेतला व स्वतःच्या इस्टेटी केल्या. मराठीतील अनेक प्रतिथयश कलावंतांना त्यांनी रजत पटावर प्रथम संधी दिली मात्र त्यांचे हे ऋण फारच थोडे जण मान्य करतात हे ही मोठे दुर्दैव.
 त्यांच्या निधनाची दखल बी.बी.सीनेही घेतली होती.  विशेष म्हणजे त्यांच्या निधनाचे बातमी आणि जपान या देशातही प्रसारित केली होती.
 खंत एकच वाटते या अशा व्यक्तिमत्वाला आजची  मराठी चित्रपट सृष्टी विसरली आहे. नाही म्हणायला त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या २०१२ च्या  ‘थर्ड आय’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात श्री. सुधीर नांदगावकरांनी  ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट दाखवला होता. 
“महात्मा“ हा चित्रपट त्यानी तीन भाषांत काढला तेव्हा “ फिल्म इंडियाचे बाबुराव पटेल यांनी ‘सॅल्यूट  टू  धर्माधिकारी’ या लेखात  त्याना गौरविले होते. ते आम्हा सर्व कुटुंबियांचे काका.  त्यांना त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आम्हा सर्वांकडून विनम्र अभिवादन.
 _डॉ. प्रियंवदा शौचे जोशी

Monday, April 22, 2019

अंतरराष्ट्रीय ग्रंथ आणि स्वामित्व हक्क दिन



Image result for unesco image world book day





आज 23 एप्रिल, जागतिक पुस्तक दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा.  हा दिवस जागतिक ग्रंथ आणि स्वामित्व हक्क दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून  युनेस्कोतर्फे जगभर कार्यक्रम राबवले जातात. वाचन संस्कृती, ग्रंथप्रकाशन वाढवणे आणि स्वामित्व हक्काचा प्रचार करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. याच बरोबर मानवतेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात हातभार लावणाऱ्या ग्रंथ आणि लेखक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हाही उद्देश असतो.
१९९५ सालापासून १०० पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा केला जातो. यु. के आणि आयर्लंडमध्ये मात्र तो मार्च महिन्यात साजरा केला जातो. हा दिवस २३ एप्रिलला साजरा करण्याचे कारण म्हणजे जॉर्जियन कॅलेंडरनुसार अनेक जागतिक मान्यताप्राप्त लेखकांची २३ एप्रिलला जयंती किंवा स्मृतिदिन असतो. उदाहरणार्थ विल्यम शेक्सपियर, Voldimir Nobokov, Manual Mejia Vallejo, Miguel de Cervantes, JoJep Pla, Maurice Druon, Hallodo'r Laxness इत्यादी.
युनेस्को, आंतरराष्ट्रीय प्रकाशक संघटना, ग्रंथ विक्रेते आणि  आंतरराष्ट्रीय ग्रंथालय संघटना दरवर्षी एक जागतिक पुस्तक राजधानी ठरवतात व येणाऱ्या वर्षात २३ एप्रिल  पासून विविध कार्यक्रम आयोजित करतात.  २०१९ सालासाठी   United Arab Emirates मधील शारजा हे शहर निवडले आहे.  यावर्षीचे घोषवाक्य आहे रीड: यू आर एन इन शारजा.  या अंतर्गत सहा प्रमुख संकल्पनांवर २३ एप्रिल २०२० पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. समावेशकता, वाचन वारसा, आऊ रिच (जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत पोहोचणे),   प्रकाशन आणि मुले याद्वारे शहरातील मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढवून ललित साहित्य निर्मितीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन कल्पनांना वाव देणे हा यामागचा उद्देश आहे.  यासाठी भाषणस्वातंत्र्य या विषयावर परिषद, तरुण कवींसाठी स्पर्धा,  ब्रेल लिपीतील ग्रंथनिर्मितीसाठी कार्यशाळा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  २०२० सालाची जागतिक पुस्तक राजधानी Kuala Lumpur  ही आत्ताच ठरवली आहे.
जागतिक ग्रंथ दिनाच्या केवळ शुभेच्छा न देता आपण सर्वांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रत्येकाने वर्षभरात किमान दोन चांगली पुस्तके वाचेन असा निर्धार केला पाहिजे. ज्यांना अजिबातच वेळ नाही पण वाचनाची आवड आहे अशांनी अमृत देशमुख यांनी सुरू केलेले बुकलेट हे ॲप डाऊनलोड करून विविध पुस्तकांचा वाचनीय व श्रवणीय आनंद घ्यायला काहीच हरकत नाही.  अनेक पुस्तके ऑडिओ स्वरूपातही उपलब्ध आहेत त्याचाही आस्वाद घेता येऊ शकतो. त्याच प्रमाणे दुसऱ्याचे लेखन, फोटो, आकृत्या वापरताना त्यांच्या स्वामित्व हक्काचा मान राखला जाईल असे पाहूया.
सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि लेखक जिम ट्रिलिज यांनी म्हटले आहे की फारसे वाचन न करणाऱ्या करणाऱ्या राष्ट्राला कमी माहिती व ज्ञान असते. आणि ज्या राष्ट्राला कमी  माहिती आणि ज्ञान असते ते राष्ट्र घर,  बाजारपेठ,  न्याय आणि नेते यांची  योग्य  निवड करू शकत नाहीत आणि या निर्णयांचा आपोआपच संपूर्ण राष्ट्रावर परिणाम होतो.

Source: http://www.unesco.org/new/en/unesco/events

Saturday, April 13, 2019

आठवणीतले प्रा. एम. आर. रिसवडकर सर

आठवणीतले प्रा. एम. आर. रिसवडकर सर

१९९९ साल.  पुणे विद्यापीठात MLISc ला प्रा. रिसवडकर सर Information Processing हा विषय शिकवणार असे समजले  आणि मनात उत्सुकता दाटून आली.  सरांबद्ल खूप ऐकले होते.   वयाच्या ७० व्या वर्षी असलेला सरांचा उत्साह आणि विषयावरील प्रभुत्व पाहून मन थक्क झाले. सर  वर्गात  कोणत्याही टिपणाशिवाय, पुस्तकाशिवाय अतिशय सहज व सोप्या भाषेत  शिकवत असत. सरांनी कधीहि एका जागी उभे राहून शिकवले नाही. सरांनी शिकवलेले Indexing, abstracting आजहि विसरू शकत नाही.  सर गेले  असे कळल्यावर २० वर्षांपूर्वीचे सरांचे शिकवणे डोळ्यासमोर आले. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…